Tuesday 4 October 2016

दुसरा समुल्लास

दुसरा समुल्लास

शिक्षण विचार

आईवडिलांची कर्तव्ये
मातृमान् पितृमानाचार्यवान् पुरुषो वेद ।।

     हे शतपथ ब्राह्मण ग्रंथातील वचन आहे. वस्तुतः आई-वडील व आचार्य (गुरु) है तीन उत्तम शिक्षक असतात तेव्हाच माणूस ज्ञानवान बनतो. ज्याचे माता पिता धार्मिक विद्वान असतात ती मुले भाग्यशाली होत आणि ते कूळ धन्य होय. मुलांना आईकडून जेवढा उपदेश मिळतो व मुलांवर जेवढे उपकार होतात तेवढे इतर कोणाकडूनही होत नाहीत. आई जशी आपल्या मुलांवर प्रेम करते, त्यांचे कल्याण करु इच्छिते तसे इतर कोणी करीत नाही. म्हणून ( मातृमान् ) म्हणजे 'प्रशस्ता धार्मिकी विदुषी माता विद्यते यस्य स मातृमान्'. जी माता गर्भधारणेपासून मुलाची विद्या पूर्ण होईपर्यंत त्याला सुशीलतेचा उपदेश करते ती धन्य होय.

     माता आणि पिता यांनी गर्भाधानापूर्वी, मध्ये आणि नंतर मादक पदार्थ, मद्य, दर्गंध, रुक्ष व बुद्धिनाशक पदार्थांचा त्याग करुन, ज्यायोगे शांतता, आरोग्य, बळ, बुद्धीपराक्रम व सुशीलता यांच्या द्वारे सभ्यता अंगी वागवावी. ते तूप, दूध, गोड अन्नपान वगैरे श्रेष्ठ पदार्थांचे सेवन करावे. ज्या योगे रजस् वीर्यही निर्दोष बनून अत्युत्तम गुणयुक्त बनते.

उत्तम संतान प्राप्त करण्याचा विधि

     ऋतुगमनाचा विधी म्हणजे रजोदर्शनाच्या पाचव्या दिवसापासून सोळाव्या दिवसापर्यंत ऋतुदान देण्याचा काळ होय. त्या दिवसातील पहिले चार दिवस त्याज्य आहेत. म्हणजे १२ दिवस उरले. त्यांतील अकरावी व तेरावी रात्र या दोन रात्री वगळून बाकीच्या १० रात्रीं मध्ये गर्भधान करणे उत्तम असते. रजोदर्शनाच्या दिवसापासून सोळाव्या रात्रीनंतर समागम करू नये. पुनःपुर्वी सांगिल्याप्रमाणे ऋतुदानाचा काळ येईपर्यंत आणि गरोदर राहिल्यापासून एक वर्षापर्यंत समागम करु नये. दोघांच्या शरीरात आरोग्य असेल, परस्पर प्रसन्नता असावी व कोणत्याही प्रकारचे दुःख नसावे. चरक व सुश्रुत या ग्रंथांमध्ये खानपान व वस्त्रप्रावरण यासंबंधी जे विधान केले आहे आणि मनुस्मृतीत स्त्रीपुरुषांच्या प्रसन्नतेची जी रीत सांगितली आहे त्यानुसार करावे व वागावे. गर्भाधानानंतर गरोदर स्त्रीने खाणे पिणे व कपडालत्ता यांच्या बाबतीत खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. गर्भवती झाल्यानंतर एक वर्षापर्यंत स्त्रीने पुरूषाशी संग करु नये. मूल जन्माला येईपर्यंत स्त्रीने बुद्धि, बळ, रुप, आरोग्य, प्रराक्रम, शांती आदि गुणकारक वस्तूंचे सूवन करीत राहावे.

     मूल जन्मल्यानंतर उत्तम सुगंधी पाण्याने त्याचे स्नान व नाळ छेदन करुन सुगंधयुक्त घृतादीचा होम करावा; आणि स्त्रीच्याही स्नानाची व भोजनाची यथायोग्या व्यवस्था करावी. त्यायोगे मूल व बाळंतीण यांची शरीरे निरोगी व धष्टपुष्ट होत जातात. ज्यायोगे दुधामध्ये उत्तम गुण उतरतील असे पदार्थ मातेने किंवा मुलाला दूध पाजणार्‍या दाईने खावेत. आईचे दूध मुलाला सहा दिवसापर्यंत पिऊ द्यावे. त्यानंतर दाईने दूध पाजावे. मात्र त्या दाईला शिशुच्या आई-वडिलांनी उत्तम पदार्थ खाऊ पिऊ घालावेत. एखादा गरीब माणूस दाई ठेवू शकत नसेल तर त्याने गायीच्या अथवा शेळीच्या दुधात बुद्धि, पराक्रम, व आरोग्य देणार्‍या उत्तम औषधी त्या शुद्ध पाण्यात भिजवून, आटवून, गाळून, त्यात दुधाऐवढे पाणी घालून ते बाळास पाजावे. जन्मानंतर मूल आणि त्याची आई यांना शुद्ध हवेच्या ठिकाणी नेऊन ठेवावे. तेथे सुवासिक व प्रेक्षणीय वस्तूही ठेवाव्यात आणि जेथील हवापाणी चांगले आहे अशा प्रदेशात त्यांना फिरवून आणणेही उचित होय.

     जेथे दाई, गाय, शेळी वगैरेचे दूध मिळण्याची शक्यता नसेल तेथे योग्य वाटेल तसे करावे. कारण प्रसूता स्त्रीच्या शरीराच्या अंशातून बाळाचे शरीर निर्माण होत असते. त्यामुळे स्त्री प्रसूतीच्या वेळी अशक्त होत असते म्हणून बाळंतिणीने मुलाला दूध पाजू नये. दूध थांबविण्यासाठी स्तनाच्या छिद्रावर औषधाचा लेप लावावा. त्याने दूध स्त्रवण थांबेल, असे केल्याने दुसर्‍या महिन्यात स्त्री पुनः युवती होते. तो पर्यंत पुरुषाने ब्रह्मचर्य पाळून वीर्याचा निग्रह करावा. ( संयम बाळगावा.) अशाप्रकारे जे स्त्री-पुरुष वागतील त्यांची संतति उत्तम दीर्घायुषी, शक्ति, बळ याची वृद्धि होत राहिल ज्यामुळे ते दीर्घायुषी बनतील आणि त्यांना होणारी सारी मुले उत्तम, बलवान, पराक्रमी, दीर्घायुषी व धार्मिक होतील. स्त्रीने योनिसंकोच मार्जन करावे पुरूषाने वीर्याचे स्तंभन करावे. त्यायोगे नंतर होणारी सर्व मुलेही उत्तम होतील.

पाच वर्षापर्यंत आई द्वारा शिक्षण

     मातेने मुलांना नेहमी चांगली शिकवण द्यावी. म्हणजे ती सभ्य बनतील आणि कोणत्याही  अंग प्रत्यंगाशी वेडेवाकडे चाळे करु शकणार नाहीत. मूल बोलू लागले की त्याची जीभ कोमल बनून स्पष्ट उच्चार करू शकेल असे उपाय आईने करावेत. ज्या वर्णाचे जे स्थान व प्रयत्न असेल उदाहरणार्थ '' चे स्थान ओठ असून दोन्ही ओठ जुळवून '' चा उच्चार कसा करावयाचा ते प्रयत्नपूर्वक शिकवावे. हस्व, दीर्घ, प्लुत (तीन मात्रांचा स्वर किंवा वर्ण) अक्षरांचे योग्य उच्चार करता यावे. मधुर, गंभीर, सुंदर स्वर; अक्षर, मात्रा, पद, वाक्य, संहिता, अवसान यांतील फरक त्यांच्या कानांना नीट समजला पाहिजे. मुले थोडीफार बोलू व समजू लागली की त्यांना सुंदर वाणीचा वापर, लहान, थोर, आदरणीय, माता, पिता, राजा, विद्वान इत्यादींशी कसे बोलावे, कसे वागावे, त्यांच्याजवळ कसे बसावे वगैरे गोष्टी शिकवाव्यात. म्हणजे त्यांच्याकडून कोठेही अयोग्य आचरण होणार नाही आणि सर्वत्र त्यांची प्रतिष्ठा होत राहील. मुले जितेंद्रिय, विद्याप्रिय, सत्संगप्रिय बनतील असा प्रयत्न करत रहावा. निष्कारण खेळणे, रडणे, हसणे, भांडणे, आनंद व दुःख करणे, कोणत्याही पदार्थाची लालसा बाळगू नये. ईर्ष्या व द्वेष करू नये. जननेंद्रियाला स्पर्श केल्याने, त्याचे मर्दन केल्याने वीर्य क्षीण होते, नपुंसकता येते आणि हाताला घाणही येते. म्हणून जननेंद्रियाला स्पर्श करू नये. मुले नेहमी खरे बोलतील आणि त्यांच्यामध्ये शौर्य, धैर्य, हसमुख वगैरे गुण ज्यामुळे येतील तसे करावे.

     मुलगा किंवा मुलगी पाच वर्षाची झाल्यावर त्यांना देवनागरी ( बाळबोध ) अक्षरांचा अभ्यास शिकवावा. अन्यदेशीय भाषांची अक्षरेही शिकवावीत.  त्यानंतर उत्तम शिक्षण, विद्या, धर्म, परमेश्वर, माता, पिता, आचार्य, विद्वान, अतिथी, राजा, प्रजा, कुटुंब, भाऊ, बहिणी, नोकर-चाकर यांच्याशी कसे वागावे. याचे शिक्षण देणारे मंत्र, श्लोक, सूत्रे, गद्य, पद्य त्यांच्याकडून अर्थसहित तोंडपाठ करून घ्यावे. त्यायोगे मुले लबाड माणसाकडून फसविली जाणार नाहीत. विद्या व धर्माविरुद्ध भ्रमात गुरफटून टाकणार्‍या सर्व गोष्टींचीही माहिती त्यांना द्यावी. म्हणजे भूतप्रेतासारख्या खोट्या गोष्टींवर त्यांचा विश्वास बसणार नाही.

भूत-प्रेत-खंडन

गुरोः प्रेतस्य शिष्यस्तु पितृमेधं समाचरन् ।
प्रेतहारैः समं तत्र दशरात्रेण शुद्ध्यति।। मनु.अ.५। श्लो.६५

     अर्थ : जेव्हा गुरूचा प्राणांत होतो तेव्हा त्याच्या मृत शरीराला प्रेत असे म्हणतात. त्याचे दहन करणारा शिष्य ते शरीर वाहून नेणाऱ्या लोकांसह दहाव्या दिवशी शुद्ध होतो. त्या शरीराचे दहन झाल्यानंतर त्याचे नाव भूत असे होते. म्हणजे तो अमुक नावाचा माणूस होता. ते उत्पन्न होऊन वर्तमानकाळी नसतात ते भूतस्य झाल्याने त्याचे नाव भूत असे होते. असा ब्रह्मापासून आजपर्यंतच्या विद्वानांचा सिद्धांत आहे. परंतु ज्याला शंका कुसंग व कुसंस्कार असतात त्याला त्याचे भय वाटते; आणि भूत, प्रेत, शाकिनी, डाकिनी वगैरे अनेक शंकाकुशंकांच्या जाळ्यात गुरफटून तो दुःखी बनतो.

     पाहा! जेव्हा एखादा प्राणी मरतो तेव्हा त्याचा जीव त्याच्या पापपुण्यानुसार परमेश्वराच्या व्यवस्थेप्रमाणे सुखदुःख युक्त फळे भोगण्यासाठी दुसरा जन्म धारण करतो. त्या अविनाशी परमेश्वाराची व्यवस्था कोणीही नाश करू शकतो काय ? अडाणी लोक वैद्यकशास्त्र अथवा पदार्थविज्ञान यांचे वाचन, श्रवण व विचार शुन्य होऊन सन्निपात ज्वारासारखे शारीरिक आजार आणि उन्मादादीसारखे मानसिक रोग झालेल्या व्यक्तिला भुताने झपाटले आहे असे समजतात. त्यांना योग्य औषधोपचार पथ्यपाणी इ. उचित काम करण्याऐवजी लबाड, पाखंडी, महामूर्ख, अनाचारी, स्वार्थी, भंगी, चांभार, शुद्र, म्लेच्छांदि यांच्यावर विश्वास ठेवून अनेक प्रकारची ढोंगबाजी, फसवाफसवी, उष्टे अन्न खाणे, गंडादोरा बांधणे, जादूटोणा, इत्यादि खोटे मंत्रतंत्र करतात व करवितात. त्यायोगे त्यांच्या धनाचा नाश होतो, मुलांची दुर्दशा होते, रोग वाढतो आणि दुःख देत फिरतात. अशा अडोळस आणि पक्क्या दुर्बुद्धि, पापी, स्वार्थी माणसांकडे जाऊन विचारतात की, 'महाराज ! या मुलाला, मुलीला, स्त्रीला किंवा पुरुषाला माहित नाही काय झालं हो ?' तेव्हा ते सांगतात की, 'यांच्या अंगात मोठं भूत, प्रेत, भैरव किंवा शीतलादि देवी आली आहे. जोवर तुम्ही त्याचा उपाय करीत नाही तोवर ते जाणार नाहीत व त्यांचा ते प्राण घेतील. तुम्ही जर त्यांना मलिदा अथवा इतकी भेट द्याल तर आम्ही मंत्र, जप पुरश्चरण करून त्यांना झाडफूक करून टाकू.' यावर ते आंधळे आणि त्यांचे नातेवाईक त्याला म्हणतात. 'महाराज! पाहिजे तर आमचं सर्वस्व घ्या; पण याला बरा करा' याने त्यांचा डाव साधतो. ते धूर्त लोक म्हणतात, 'ठीक आहे. इतक्या वस्तू आणा. एवढी दक्षिणा द्या. देवाला अमुक पदार्थ अर्पण करा. ग्रहदान करा.  झांजा, मृदंग, ढोल, थाळी ते आजाऱ्यासमोर वाजवितात, गातात आणि त्यांच्यापैकी एक ढोंगी उन्मत्तपणे नाचून उड्या मारीत म्हणतो, 'मी याचा प्राणच घेणार.' तेव्हा ते आंधळे म्हणजे अंधश्रद्धाळू लोक निम्नकोटीच्या लोकांच्या पायांवर डोके ठेवून म्हणतात, 'तुम्हाला हवं असेल ते घ्या. पण याला वाचवा.' यावर तो लबाड म्हणतो, 'मी हनुमान आहे. आणा चांगली मिठाई, तेल, शेंदूर, सव्वा मणाचे रोट आणि लंगोट. मी देवी किंवा भैरव आहे. आणा दारूच्या पाच बाटल्या, वीस कोंबड्या, पाच बकरे, मिठाई आणि वस्त्रे.' जेव्हा ते सांगतात की, 'हवं ते घ्या.' तेव्हा तो उन्मत्त जास्तच नाचू लागतो. परंतु जेव्हा एखादा शहाणा माणूस त्याला पाच जोडे मारतो, लाथांनी तुडवतो किंवा दंडुक्याने चोपतो तेव्हा त्याच्या अंगात आलेला मारुती, देवी किंवा भैरव लगेच प्रसन्न होऊन पळून जातात. कारण लोकांना लुबाडण्यासाठी लबाड लोकांनी केलेल ते निव्वळ ढोंग असते.

ग्रहशांतीचे ढोंग

     तसेच, जेव्हा असे अडलेले लोक ग्रहग्रस्त, ग्रहरुप ज्योतिर्विद्याभ्यासीकडे जाऊन विचारतात की, 'महाराज! याला काय झालय ?' तेव्हा ते सांगतात की,' याच्यावर सूर्य वगैरे क्रूर ग्रहांचे आक्रमण झाले आहे. त्यासाठी तुम्ही त्यांची शांती, पाठ, पूजा, दान करविल्यास तो बरा होईल. नाहीतर याच आजारानं कष्ट दुःख सोसत तो मरून गेल्यास आश्चर्य नाही.'

(उत्तर) बोला ज्योतिर्विद ! जशी ही पृथ्वी जड (अचेतन) आहे तसेच सूर्यआदि लोक आहेत. ते उष्णता आणि प्रकाश देण्याखेरीज इतर काहीही करू शकत नाहीत. काय हे चेतन आहेत ? क्रुद्ध होऊन दुःख आणि शांत होऊन सुख देऊ शकतील ?

(प्रश्न) या जगात राजा व प्रजा सुखी व दुःखी होत आहेत ते ग्रहांचे फळ नाही काय ?
(उत्तर) नाही. ती सारी पापपुण्याची फळे आहेत.

(प्रश्न) तर मग ज्योतिषशास्त्र खोटे आहे काय ?
(उत्तर) नाही. त्यामध्ये अंकगणित, बीजगणित, रेखागणित या ज्या विद्या आहेत त्या सर्व खऱ्या  आहेत. परंतु ग्रहाच्या फळाचे जे ढोंग माजवले आहे ते मात्र सर्व खोटे आहे.

जन्मपत्रिकेचे ढोंग

(प्रश्न) ही जन्मपत्रिका ए ती निरर्थक आहे काय ?
(उत्तर) होय. ती जन्मपत्रिका नसून तिचे नाव 'शोकपत्रिका' ठेवले पाहिजे. कारण जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा सर्वांना आनंद होतो. मात्र त्याची जन्मपत्रिका तयार होऊन ग्रहाची शुभाशुभ फळे समजत नाहीत तो पर्यंतच तो आनंद टिकतो. जेव्हा पुरोहित जन्मपत्रिका बनविण्याची गोष्ट काढतो तेव्हा बाळाचे आईबाप पुरोहिताला सांगतात, "महाराज ! आपण खूप चांगली जन्मपत्रिका तयार करा." आईबाप श्रीमंत असल्यास फलज्योतीषी लाल पिवळ्या रेघोट्या ओढून चित्रविचित्र जन्मपत्रिका तयार करतात आणि आईबाप गरीब असल्यास सामान्य प्रकारची जन्मपत्रिका बनवून शुभाशुभ फळे सांगायला येतात. मग आईबाप ज्योतिषीबुवासमोर बसून विचारतात, 'याची जन्मपत्रिका चांगली आहे ना ?' ज्योतिषी सांगतो, 'जे आहे ते सांगतो. याचे जन्मग्रह अत्यंत चांगले असून मित्रग्रहही उत्तम आहेत. यामुळे तो धनाढ्य व प्रतिष्ठावान् होईल. चार लोकांत बसला म्हणजे सर्वांवर त्याचे तेज पडेल. शरीराचे आरोग्य उत्तम असून त्याला राजमान्यताही मिळेल.' इत्यादी गोष्टी ऐकून वडील म्हणतात, 'वाहवा ! ज्योतिषीबुवा, तुम्ही खूपच चांगले आहात.' परंतु यातून आपला हेतू साध्य होणार नाही हे आळखून ज्योतिषी पुढे सांगतो, 'ग्रह तर उत्तम आहेत. परंतु काही ग्रह क्रूर आहेत. त्यामुळे अमुक अमुक ग्रहांच्या योगामुळे मुलाला आठव्या वर्षी मृत्यूयोग आहे. हे एकताच आईबाप पुत्रजन्माचा आनंद विसरून शोकसागरात बुडू लागतात आणि ज्योतिषबुवांना विचारतात, 'महाराज ! आता आम्ही काय करावं.' यावर ज्योतिषीजी सांगतात, 'उपाय करा.' गृहस्थ विचारतो, 'कोणता उपाय करायचा ?' मग ज्योतिषीजी सांगू लागतात, 'असं-असं दान करा. ग्रह शांतीसाठी मंत्रजप करवा आणि नेहमी ब्राह्मणांना जेवू घालाल तर बहुधा नवग्रहांची विघ्ने दूर होतील.' येथे ते 'अनुमान' शब्द अशासाठी वापरतात की एवढे सारे करूनही मुलगा मेलाच तर त्यांना असे म्हणता यावे की, 'आम्ही काय करणार ? परमेश्वरापुढे कोणाचे काय चालणार ? आम्ही तर खूप खटपट केली आणित तुम्हीही करवून घेतली. पण त्याचे कर्म तसचे होते !' आणि जर योगायोगाने मुलगा वाचला तर, तर ते म्हणणार, 'बघा आमचे मंत्र, देवता आणि ब्राह्मण यांचे केवढे सामर्थ्य आहे ! यांनी तुमच्या मुलाचा जीव वाचविला.' अशा वेळी त्यांच्या जपाने व मंत्रपाठाने मुलाचे प्राण वाचले नाहीत तर त्या लबाड माणसांकडून दुप्पट-तिप्पट रुपये वसूल केले पाहिजेत आणि मूल वाचले तरीही पैसे वसूल केले पाहिजेत. कारण ज्योतिषबुवांनी सांगितले होते की, 'याचे कर्म आणि परमेश्वाचे नियम मोडण्याचे सामर्थ्य कोणताच नाही.' त्या गृहस्थानेही असे म्हणावे की, 'हा आपल्या कर्मामुळे आणि परमेश्वराच्या नियमामुळे वाचला आहे; तुमच्या प्रयत्नांमुळे नव्हे.' तसेच गुरू वगैरेही दानपुण्य करायला लावून ते स्वतः सारे घेत असतील तर त्यांनाही ज्योतिषीजी बुवांना जे उत्तर दिले तसेच उत्तर दिले पाहिजे.

मंत्र-तंत्र

आता शीतळा (देवी रोगाची देवता) आणि मंत्र, तंत्र, यंत्र इत्यादींच्या बाबतीतही हे लोक अशीच सोंगे-ढोंगे करतात. कोणी म्हणतो, 'आम्ही मंत्र म्हणून गंडादोरा किंवा यंत्र वगैरे तयार करून दिल्यास आमचे देव आणि पीर त्या मंत्रयंत्राच्या प्रतापाने त्याला काही विघ्नबाधा होऊ देत नाहीत.' त्यांनाही असेच विचारले पाहिजे की, 'तुम्ही मृत्यू, परमेश्वाचे नियम आणि कर्मफळ यांच्यापासून रक्षण करू शकता काय ? तुम्ही हे सारे करता तरीपण कितीतरी मुले मरतात. किंबहुना खुद्द तुमच्या घरची मुलेही मरतात. तुम्ही कुणाचे मरण टाळू शकता काय ?' यावर ते लबाड लोक काहीही बोलू शकत नाहीत; आणि येथे आपली डाळ शिजणार नाही असे समजतात. म्हणून हे सर्व खोटे व्यवहार सोडून देऊन धार्मिक, सर्व देशाचे उपकारकर्ते, निष्कपट वृत्तीने सर्वांना विद्या देणारे, उत्तम विद्वान लोक जसे जगावर उपकार करतात तसे त्यांच्यावरही उपकार करावेत. हे काम कधीही सोडू नये. जे लोक रसायन, जारण, मारण, मोहन, उच्चाटण, वशीकरण वगैरे लीला करतात तेही अत्यंत पामर आहेत असे समजले पाहिजे.

वीर्य रक्षण

     वरील सगळ्या गोष्टी खोट्या आहेत हे मुलांना लहानपणीच पटवून दिले पाहिजे. म्हणजे आपली मुले कोणत्याही भ्रमात सापडून दुःखी होणार नाहीत. वीर्याचे रक्षण केल्याने आनंद मिळतो आणि वीर्यनाश हा दुःखाला कारणीभूत होतो याची जाणीव करून दिली पाहिजे. उदाहरणार्थ, 'बघा, ज्याच्या शरीरात वीर्य सुरक्षित राहते त्याचे आरोग्य, बुद्धि, बळ, पराक्रम वाढून खुप सुख मिळते. वीर्यरक्षणाची रीत अशी आहे की विषयवासनेच्या गोष्टी बोलू-ऐकू नयेत. विषयी लोकांची संगत धरू नये, विषयवासनेचे चिंतन करू नये, सूत्रीचे दर्शन, एकांतसेवन, संभाषण व स्पर्श वगैरे गोष्टी ब्रह्मचाऱ्यांनी टाळून उत्तम शिक्षण व पूर्ण र्विद्या मिळवावी. असे तुम्ही वागावे. ज्याच्या शरीरात वीर्य नसते तो नपुंसक महाकुलक्षणी असतो आणि ज्याला प्रेमह (परमा) रोग होतो तो दुर्बळ, निस्तेज, निर्बुद्ध बनतो. त्याच्यातील उत्साह, साहस, धैर्य, बळ, पराक्रम वगैरे गुण नाहीसे होऊन तो स्वतः नष्ट होतो. तुम्ही जर यावेळी उत्तम शिक्षण घेतले नाही, विद्या मिळविली नाही, वीर्याचे रक्षण केले नाही तर या जन्मात पुनः तुम्हाला अशी सुवर्णसंधी मिळणार नाही. जो पर्यंत आम्ही गृहस्थाश्रमातील कर्तव्ये पार पाडणारे जिवंत आहोत तोपर्यंत तुम्ही विद्याध्ययन केले पाहिजे व शरीर सामर्थ्य वाढविले पाहिजे.'
अशाच प्रकारचा इतरही उपदेश आई वडिलांनी मुलांना करावा.

     म्हणूनच वरील वचनात 'मातृमान पितृमान्' हे शब्द आले. याचा अर्थ असा की मुलाच्या जन्मापासून पाचव्या वर्षापर्यंत मुलांना मातेने आणि वयाच्या सहाव्या वर्षापासून आठव्यावर्षापर्यंत पित्याने शिक्षण द्यावे. नवव्या वर्षाच्या प्रारंभी द्विजांनी आपल्या मुलांचे उपनयन (मुंज) करून त्यांना आचार्यकुलात म्हणजे जेथे पूर्ण विद्वान पुरूष व पूर्ण विदूषी स्त्रिया विद्यादान, करतात, तेथे मुलांना व मुलींना पाठवावे आणि शूद्रादि वर्णाच्या लोकांनी उपनयन न करता विद्याभ्यासासाठी मुलांना गुरूकुलात पाठवावे. जे लोक शिक्षणाच्या बाबतीत मुलांचे लाड न करता त्यांना शिक्षा करतात त्यांचीच मुले विद्वान, सभ्य व सुशिक्षीत बनतात. याल् व्याकरण महाभाष्याचा पुढील आधार आहे :-

सामृतैः पाणिभिर्घ्नन्ति गुरवो न विषोक्षितैः ।
लालनाश्रयिणो दोषास्ताडनाश्रयिणो गुणाः ।। व्या.महा.अ.८। आ.१।श्लो.८

अर्थः- जे आई वडील आणि आचार्य मुलांना व शिष्यांना ताडन (शिक्षा) करतात ते जणू आपल्या मुलांना व शिष्यांना आपल्या हातांनी अमृत पाजतात; आणि जे मुलांना किंवा शिष्यांचे लाड करतात ते आपल्या मुलांना व शिष्यांना विष पाजून त्यांचा नाश करतात. कारण लाडाने मुले व शिष्य दुर्गुणी आणि शिक्षेने (ताडनाने) सद्गुणी बनतात. मुले आणि शिष्य यांनीही शिक्षा झाल्यास त्याबद्दल वाईट वाटून न घेता आनंदच मानावा आणि लाड झाल्यास त्याचे दुःख मानावे. मात्र माता, पिता आणि अध्यापक यांनी मनात ईर्ष्या व द्वेष बाळगून शिक्षा करू नये. वरून त्यांनी भीति दाखवावी. परंतु मनातून त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवावी.

सदाचाराचे शिक्षण

     इतर शिक्षणाप्रमाणेच चोरी, जारी, आळस, प्रमाद, मादक पदार्थ सेवन, मिथ्या भाषण, हिंसा, क्रौर्य, ईर्ष्या, द्वेष, मोह इत्यादी दोष मुलांनी सोडावेत. व सत्याचरण करावे, अशी शिकवण त्यांना द्यावी. कारण एखाद्या व्यक्तीने एकदा जरी चोरी, जारी, मिथ्या भाषण अशासारखी गोष्ट केली तरी तिच्या मृत्यूपर्यंत तिला प्रतिष्ठा मिळत नाही. केलेली प्रतिज्ञा मोडल्याने जसे नुकसान होते तसे नुकसान इतर कोणत्याही गोष्टीने होत नाही. म्हणून ज्याच्या समोर जी काही प्रतिज्ञा केली असेल त्याच्या समोर ती जशीच्या तशी पूर्ण केली पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्याने दुसर्‍याला सांगितले की, 'मी तुला अमुक वेळी भेटेन किंवा तू मला अमुक वेळी भेट किंवा अमुक वस्तू मी अमुक वेळी तुला देईन.' तसे त्याने केले नाहीतर त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. म्हणून प्रत्येकाने नेहमीच खरे बोलावे व दिलेला शब्द पाळावा. कोणीही गर्व करू नये. कारण 'अभिमानः श्रियं हन्ति' असे विदुरनीतीचे वचन आहे. अभिमान म्हणजे अहंकार हा सारी शोभा व लक्ष्मी यांचा नाश करतो. म्हणून गर्व करू नये. फसवाफसवी, कपट व कृतघ्नता यामुळे आपलेच हृदय दुःखी होते; मग इतरांची काय कथा ? आत एक व बाहेर एक असणे, दुसर्‍यास मोहात अडकविणे आणि दुसर्‍याचे काय नुकसान होईल याची पर्वा न करता आपला स्वार्थ साधणे याला फसवणूक व कपट असे म्हणतात. कोणी केलेले उपकार न स्मरणे म्हणजे कृतघ्नता होय. क्रोध वगैरे दुर्गुण आणि कटुवचन सोडून देऊन माणसाने शांत व मधुरवचनच बोलावे आणि फार बडबड करू नये. जेवढे बोलावयास आणि प्रथम 'नमस्ते' करावे. त्यांच्यासमोर उत्तमासनावर बसू नये. सभेमध्ये जेथून कोणी आपल्याला उठविणार नाही अशा आपल्या योग्यतेच्या जागी बसावे. जेणे करून कुणी उठविणार नाही. कोणालाही विरोध करू नये. प्रसन्नतेने गुणांचे ग्रहण व दोषांचा त्याग करावा. सज्जनांची संगत धरावी आणि दुष्टांचा त्याग करावा. आपले आई-वडील आणि आचार्य यांची तनमनधनाने व उत्तमोत्तम पदार्थांनी प्रेमपुर्वक सेवा करावी.

यान्यस्माकँ् सुचरितानि तानि त्वयोपास्यानि नो इतराणि।। तै.उ.शिक्षा.११

     त्याचा अर्थ असा की आई-वडील व आचार्य यांनी आपल्या मुलांना व शिष्यांना नेहमी सत्याचा उपदेश करावा; आणि असेही सांगावे की आपली जी-जी धर्मयुक्त कृत्ये आहेत त्यांचे तुम्ही ग्रहण करा आणि जी-जी दुष्ट कृत्ये आहेत त्यांचा त्याग करीत जावा. जे-जे सत्य जाणाल त्याचा प्रकाश व प्रचार करा. कोणाही पाखंडी व दुराचारी माणसावर विश्वा ठेवू नका; आणि आई-वडील व आचार्य जे-जे उत्तम कार्य करण्यास आज्ञा देतील त्या आज्ञांचे पुर्णपणे पालन करावे. जसे, आई-वडीलांनी धर्म, विद्या, सदाचरण यांविषयीचे श्लोक, 'निघण्टु', 'निरूक्त', 'अष्टाध्यायी' हे ग्रंथ अथवा इतर सूत्रे किंवा वेदमंत्र तोंडपाठ करवून घ्यावेत व त्यांचा अर्थ पुनः पुनः विद्यार्थ्यांना समजावून सांगावा. जसे प्रथम समुल्लासात परमेश्वराचे व्याख्यान केले आहे त्याप्रमाणे मानून घेऊन परमेश्वराची उपासना करावी. ज्यायोगे आरोग्य, विद्या व बल प्राप्त होईल अशा प्रकारचे भोजन, वस्त्र आणि इतर व्यव्हार करावेत व जेवढी भूक असेल त्यापेक्षा थोडे कमीच खावे. मद्य, मांसाचे सेवन करू नये. अज्ञात सखोल पाण्यात जाऊ नये. कारण जलचर अथवा दुसर्‍या एखाद्या वस्तूपासून दुखापत होण्याची शक्यता असते आणि पोहायला येत नसेल तर बुडून मरण्याचीही भीती असते. 'नाविज्ञाते जलाशये' हे मनूचे वचन आहे.
माहिती नसलेल्या जलाशयात उतरून स्नान वगैरे करू नये.

दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं जलं पिबेत्।
सत्यपूतां वदेद्वाचं मनःपूतं समाचरेत्।। मनु.अ.६।श्लो.४६
अर्थः- दृष्टि खाली करून उंचसखल जागा पाहून चालावे. पाणी वस्त्रगाळ करून प्यावे. सत्याने पवित्र करून वचन बोलावे. मनाने विचाराचे आचरण करावे.

माता शत्रुः पिता वैरी येन बालो न पाठितः।
न शोभते सभामध्ये हंसमध्ये वको यथा ।। चाणक्य नीती अ.२।श्लो.११
     हे कोण्या कवीचे वचन आहे. ज्या आईबापांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले नसेल ते त्यांचे पूर्णपणे वैरीच होत. ज्याप्रमाणे हंसाच्या समुदायात बगळे शोभत नाहीत त्याप्रमाणे ते विद्वानांच्या सभेत तिरस्कृत होतात आणि शोभत नाहीत. आपल्या मुलांना तनमनधनाने विद्या, धर्म, सभ्यता आणि उत्तम शिक्षण देणे हे आईवडिलांचे कर्तव्य कर्म, परमधर्म आणि कीर्तिचे कार्य आहे.

     बालशिक्षाविषयी हे थोडेसे विवेचन केले. एवढ्यावरून बुद्धीमान लोक पुष्कळ काही सणजून घेतील.

इति श्रीमद्दयानन्दसरस्वतीस्वामिकृते
सत्यार्थप्रकाशे सुभाषाविभूषिते बालशिक्षाविषये

द्वितीयः समुल्लासः सम्पूर्णः।।२।।

No comments:

Post a Comment